सगळेच आजार किंवा रोग त्रासदायकच असतात. पण त्वचारोग जरा जास्तच! म्हणजे त्या रोगाचा त्रास तर होतोच पण त्वचेचा आजार असल्याने इतरांना सहज दिसतो आणि लोकांच्या साशंक नजरांना तोंड देणे अवघड होते. असाच एक त्वचारोग म्हणजे सोरियासिस.

आजची अटळ धावपळ, कमालीची ताण पातळी, मानसिक ताण, अनावश्यक विचार, मनाचा कमकुवतपणा, अती हळवेपणा, रात्रीचे जागरण, रात्री दह्याचे सेवन, अपथ्य, जास्त आंबट, आंबवलेल्या पदार्थांचे सेवन, फास्ट आणि जंक फूडचे सेवन, पोटात जंत असणे, खूप जास्त प्रमाणात औषधी सेवन, त्वचा संवेदनशील असणे, रक्तदोष इत्यादी कारणांमुळे सोरियासिस उद्भवतो. पण योग्य औषधोपचार आणि पथ्य यामुळे  सोरियासिस बराही होऊ शकतो.

मला आठवते, काही वर्षांपूर्वी माझ्याकडे एक ४५ वर्षांची गृहिणी आली होती. त्या महिलेच्या संपूर्ण शरीरावर लाल चकत्ते होते आणि त्यावर खवले झाले होते. खाजही होती. कधीकधी त्यातून रक्तस्राव आणि पु-स्रावही व्हायचा. डोक्यात खवडा झाला होता, खूप खाज आणि सोरियासिसचे पॅच होते. संपूर्ण शरीराची त्वचा खूप कोरडी, शुष्क आणि जाड झाली होती. पूर्ण शरीरावर पॅचेस होते.

डॉक्टर म्हणून सगळे जाणून घेत असताना लक्षात आले की त्यांच्या डोक्यावर खूप जास्त ताण होता, जेवणाच्या वेळा अनियमित होत्या, जेवणाकडे साफ दुर्लक्ष होते. त्याची परिणती सोरियासिसमध्ये झाली होती. सोरियासिस पित्त दोष व उष्ण प्रकृतीमुळे होतो. आणि हा रोग बरा करायचा तर रक्त शुद्धीकरण, पित्तदृष्टि व रक्तदोष दूर करावा लागेल. त्यासाठी तशा प्रकारची उपचार योजना करावी लागेल असे मी त्यांना समजावले. पूर्ण बरे होण्यासाठी सहा ते आठ महिन्यांचा अवधी लागेल याचीही कल्पना दिली.

उपचाराला सुरुवात करताना, पहिले सात दिवस अभ्यंगम्‌ केले. त्यावेळी जाणीवपूर्वक वर्णगणातील व कुष्ठघ्न औषधियुक्त तेलाने मसाज केले व नंतर तक्रधारा केली. यामध्ये तक्र आधी पित्तशामक औषधाने सिद्ध केले आणि त्याने तक्रधारा केली.

दुसर्‍या आठवड्यात, त्या महिलेला जवळजवळ ६०-७०% आराम वाटत होता. तिसर्‍या आठवड्यात पुन्हा तक्रधरा केली. कुष्ठघ्न तेलाने मालिश केले. काही औषधांची बस्ती दिली. यानंतर ९०% पॅचेस नाहिसे झालेले होते. जे काही छोटे एक-दोन पॅचेस राहिले होते त्यांना सात-सात दिवसांनी जळु चिकित्सा केली.

यासोबतच ७-८ महिने पोटातून घेण्यासाठी औषध दिले. त्यामध्ये महामंजिष्ठाधि काढा, पंचतिक्तघृत, मणिभद्रलेह, स्नुह्यादीलेह, सोरिया ऑईल, महातिक्तघृत, एलादि तेल, दिनेशवल्यादिकेरम, नाल्पामरादिकेरम, प्रभंजन विमर्दनम तेल इत्यादींची योजना केली. हरिद्राखंड, खदिरारिष्टम, आरग्वधारिष्टम, गोक्षुरादिगुलिका यांचा समावेश केला. या औषधांच्या सहाय्याने रक्त व पित्त दृष्टि समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा दोष नाहिसा झाल्याने त्वचेचे थर आतून भरत आले.

नाडी व दोषांची अवस्था कटाक्षाने पाहूनच औषधी व पंचकर्म यांची योजना करावी लागते. वरील उपचार योजनेचा रुग्णाला फायदा झाला. गेल्या पाच वर्षांपासून त्या महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आज त्या आनंदाने जीवन जगत आहेत.

डॉ. नीतेश खोंडे


[rev_slider alias=”home_hindi”]